रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ 2023 विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहे. तसेच यंदाच्या वर्षात या संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे आणि संघ नावाला लौकिक अशी कामगिरीही करत आहे. भारतीय संघाने यापूर्वी 2011 मध्ये विश्वचषक जिंकला होता. रोहितचा संघ याच पुनरावृत्तीच्या मार्गावर आहे.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने सलग 6 सामने जिंकले आहेत. यंदाचा विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघाला आणखीन 5 सामने जिंकायचे आहेत. विश्वचषक पुन्हा एकदा आपल्या नावावर करण्यासाठी भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. काल झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातला खरा हिरो हा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ठरला. त्याने 22 धावा देत 4 महत्त्वपूर्ण गडी बाद करत सामना भारताच्या बाजूने झुकवला.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत मोठ-मोठ्या धावसंख्या पार करण्यात संघ ही यशस्वी ठरले आहेत. कालच्या सामन्यात भारतीय संघाने 230 धावांचे आव्हान इंग्लंड पुढे ठेवले होते, तरी देखील ते आव्हान इंग्लंडला पार करता आले नाही. इंग्लंडचा शंभर धावांनी पराभव झाला. याचे कारण म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने केलेली धारदार गोलंदाजी होय.
मोहम्मद शमी यांच्या कामगिरीवर एक नजर टाकली असता, त्याने विश्वचषकातील प्रत्येक सतराव्या चेंडूवर विकेट घेतली आहे. म्हणजेच जसप्रीत बुमराह याच्यापेक्षाही त्याची सरासरी चांगली आहे. शमी यंदा त्याचा तिसरी विश्वचषक स्पर्धा खेळतोय. यापूर्वी त्याने 2015 आणि 2019 मध्ये देखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या दोन्ही विश्वचषकात मिळून त्याने 13 सामन्यात 40 विकेट आपल्या नावे केले आहेत. यासह त्याने दोनदा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. विश्वचषक स्पर्धेत अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे. 54 धावा देत पाच विकेट ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. मागील विश्वचषक स्पर्धेत त्यांनी अफगाणिस्तान विरुद्ध खेळताना हॅट्रिक देखील नोंदवली होती.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या चार सामन्यात मोहम्मद शमीला संधी मिळाली नव्हती. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या अनफिट झाला आणि त्याच्या जागेवरती पुढच्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळताना मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आले. मोहम्मदने या संधीचे सोनं करत पहिल्याच सामन्यात पाच गडी बाद केले. यासह दोन सामन्यात मिळून त्यांनी नऊ गडी बाद केले.
भारताकडून विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम जहीर खान आणि जवागल श्रीनाथच्या नावावर आहे. या दोघांनी मिळून प्रत्येकी 44 विकेट घेतल्या आहेत. या दोघांचा विक्रम पाठीमागे टाकण्यासाठी त्याला आणखीन पाच विकेट घेण्याची गरज आहे.
मोहम्मद शमीच्या वन-डे कारकीर्दीवर एक नजर टाकली असता त्याने 95 डावात 180 विकेट घेतले आहेत. 200 विकेट पूर्ण करण्यासाठी त्याला अजून 20 विकेटची गरज आहे. त्याने तीन वेळा पाच विकेट तर दहा वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम देखील केला होता. तसेच विश्वचषक स्पर्धेत सहा वेळा चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे. अशी धारदार गोलंदाजी तो करत असल्यामुळे रोहित शर्मा पुढील सामन्यात मोहम्मद शमीला बेंचवर बसविण्याचे धाडस चुकून देखील करणार नाही.