Ind vs Pak: विश्वचषकात भारताकडून पाकिस्तानची पराभवाची मालिका संपता संपत नाही. 2023 विश्वचषकात अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाला शनिवारी भरताकडून 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. विश्वचषकात भारताकडून पराभूत होण्याची ही पाकिस्तानची 8वी वेळ आहे. विश्वचषकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत दोन्ही संघ आठ वेळा आमनेसामने आले आहेत आणि प्रत्येक वेळी भारताने विजय मिळवला आहे.
विश्वचषकात भारतीय संघाला पराभूत करणे हे पाकिस्तानचे स्वप्नच राहिले आहे. या विजयामुळे दिवाळीपूर्वीच भारतीय क्रिकेट प्रेमींना फटाके फोडण्याची संधी भारतीय संघाने दिली. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षक आले होते. भारताचा हा विजय पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
🇮🇳💙💙 pic.twitter.com/dj2tKx8JBj
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) October 14, 2023
Ind vs Pak : विश्वचषक सामन्याचे हाल.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर अब्दुल्ला शफीक (20) आणि इमाम उल हक (36) बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. मात्र 155 धावांवर बाबरची (50) विकेट पडल्यानंतर पाकिस्तानचा डाव पत्त्यासारखा कोसळला. भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानचा संघ 50 षटके देखील खेळू शकला नाही. पाकिस्तान 42.5 षटकात सर्व बाद 191 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताकडून बुमराह, सिराज, पंड्या, कुलदीप आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शार्दुल ठाकूर ला एकही बळी मिळवता आला नाही.

प्रत्युत्तरात कर्णधार रोहित शर्माच्या 86 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाने हा सामना सात विकेटने जिंकला. रोहित शर्माने 63 चेंडूत ताबडतोब 86 धावा काढल्या यात सहा षटकार आणि सहा चौकाराचा समावेश होता.
रोहित मागील विश्वचषकाप्रमाणे शानदार खेळी करत आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात दमदार शतकी खेळी केली. त्यानंतर आज पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही शानदार फलंदाजी केली. सुरुवातीपासूनच मोठे फटके खेळत पाकिस्तानी गोलंदाजांना त्याने दडपणाखाली ठेवले. आफ्रिदीच्या स्लोवर चेंडूवर तो अखेर झेलबाद झाला. त्याचे शतक 14 धावांनी हुकले.
धावांची गती वाढवण्याच्या नादात गिल 16 धावांवर बाद झाला. त्याला शाहिनशहा आफ्रिदीने बाद केले. विराट कोहली चांगल्या लईत खेळत असताना तीन चौकार मारल्यानंतर बाद झाला. श्रेयस अय्यरनेही नाबाद ५३ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाने 30.3 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. पाकिस्तानकडून शाहीन शहा आफ्रिदीने 36 धावा देत दोन गडी बाद केले तर हसन अली याने 34 धावात एकमेव गडी बाद केला.
तसेच भारताचा या स्पर्धेतला हा सलग तिसरा विजय आहे. या विजयासह भारत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतला आहे. भारताचा पुढचा सामना 19 ऑक्टोबर रोजी पुणे येथे गहुंजे स्टेडियमवर बांगलादेश विरुद्ध होणार आहे.
हेही वाचा:
विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..