भारतीय संघाने ‘ही’ चूक सुधारली नाही तर वर्ल्ड कप गेलाच समजा! वाचा काय म्हणाले गावस्कर
भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला पहिल्या वनडे सामन्यात १२ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला जिंकण्यासाठी ३५० धावांचे बलाढ्य आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात १३१ धावांवर न्यूझीलंडचे ६ फलंदाज माघारी परतले होते. मात्र किवी संघाने डगमगून न जाता शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. हा सामना भारताने आपल्या खिशात घातला. मात्र सामना झाल्यानंतर, माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारतीय संघाच्या रणानितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सुनील गावस्कर यांनी म्हटले की, “धावांचा बचाव करणं ही भारतीय संघासाठी नेहमीच समस्या राहिली आहे. भारतीय संघ धावांचा पाठलाग करताना मजबूत संघ आहे. जर हीच स्थिती म्हणजे भारतीय संघाला ३५० धावांचा पाठलाग करायचा असता, तर भारतीय संघाने देखील यशस्वीरीत्या पाठलाग केला असता.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “आपण यापूर्वी देखील पाहिलं आहे. टी -२० स्वरूपात भारतीय संघ १९०-२०० धावांचे आव्हान पूर्ण करू शकतो. मात्र जेव्हा धावांचा बचाव करण्याची वेळ येते त्यावेळी भारतीय संघाला अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे हे स्पष्ट दिसून येत आहे की, गोलंदाजी हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. या बाबतीत भारतीय संघाला विचार करावा लागेल.”
यावर्षी वनडे विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. त्यामुळे सुनील गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार भारतीय संघाला गोलंदाजीवर अधिक भर द्यावा लागणार आहे. या स्पर्धेला काही महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला लवकरात लवकर गोलंदाजी लाईनअप देखील तयार करावी लागणार आहे.